Friday, December 2, 2016

पारसस्पर्श .........



शाळेत असताना उन्हाळी सुट्टीची मजा काही औरच असायची. आजोबा आणि आजीकडे काही दिवस जायचे. सकाळी सकाळी आजी गरमागरम घावणे बनवायची ते खाऊन आजोबा बरोबर गुरांना नदीकाठी राखणीस घेऊन जायचं. त्यांच्या बरोबर हिंडायचं, पानाच्या खोच्यात करवंद एकत्र करून खायची, कुठेतरी राहिलेला शेंगदाणा उपटून काडायाचा, काठीने तलवारबाजी चा उद्योग- अस सार चालायचं.
आजोळ कडचे दिवस संपले की घरी जाताना डोळ्यात गंगा जमुना जमायच्या. दुखद मनाने निरोप घेऊन घरी परतायचो.
" वैता हा हांव, काळजी घे गे. "


आणि इकडे आलो कि आमच मित्रमंडळी तर वाटच बघत असायची कि आमच अजून एक पट्ट्या चेंडू फळी खेळायल कधी येतोय!
" इतके दिवस खय गेललय रे, आमी दररोज खेला होतो"


पण घरात पावसाच्या तयारीची लगबग चालायची. आमच्या भाषेत " पेईगे' ओरडायला लागला म्हणजे समजायचं, पाऊस नक्की पोहोचणार दोन दिवसात केरळवरून.
" पाउस लागतोलो नक्की दोन दिवसांत, दिये पण लागान गेले ना!"


पावसाच्या आगमनामुळे, अगदी गोठा शिवाण्यापासून लाकडांचे सलपे, शेणी मंचावर भरून ठेवण्यापर्यंत सगळी काम चालायची. मग त्यात आमच्या सारख्या चिमुकल्यांचा पण मोठ्यांना हातभार लागायचा.  संध्या काळचे चार-साडे चार झाले म्हटल्यावर मळ्यात क्रिकेट खेळणाऱ्या मंडळींची ओढ लागायची. बेटिंग, बोलिंग, फिल्डिंग करण्यात समाधान वाटायचे. अजून काही नको दिवसाकाठी.
" खेळोन-खेळोन पॉट भरला मु, आयज जेव नाकात"


पहिल्या रिमझिम सरींनी जागलेला गावच्या मातीचा सुगंध अजूनही मला पूर्णत्वाची जाणीव करून देतो. फार तर अडीच दशकांच्या कालावधीत त्याचा गोडवा अजिबात ओसरलेला नाही.
"काय मस्त वास येता रे, कसलो तो? अरे मेल्या जमनिचो तो - पयलोच पावस लागलो नाय आज! "



 पण एकदा मात्र वरूणराजा वर्षाव करू लागल कि आमच्या क्रिकेटचा खेळखंडोबा. सगळी पत्ठेमंडळी मग बिळातील बेडकं.



 मृग नक्षत्र धरल कि पाउस मग जोरदार. ओहोळाला चांगला पूर यायचा. घर खालच्या भागात पडल्याने पूराच पाणी घरात कोंडून ठेवायचं. सर्वात वरच्या पायरी पर्यंत पाणी लागुन अंगण तळ व्हायचं.
आणि त्यात एखादा साप जातान दिसला कि अजून धडकी भरायची.  मग पाणी उतरल्यावर आमचा बोका आणायचा एखादा सरपटणारा पाहुणा पडवीत! आणि बसायचा त्याच्या बरोबर खेळत.
इकडे बाबा घराच्या छप्परला, कुठे-कुठे पाणी ठिबकतय ते बघायचे आणि आम्ही इकडे खिडकीत बसून पाण्याचा खेळ बघायचो.
" ह्या अवराक खूप उदिक येयला ह्या वरसा !"


शाळेची चाहूल लागायची. मग सावकाश कोंडलेल्या छत्र्या बाहेर पडून श्वास घ्यायाल्या लागायच्या. दप्तर पाठीला मारून शाळेची वाट धरायचो, वडिलांचा कटाक्ष कि चांगला अभ्यास केला पाहिजे. माझ घर-कुटुंब शेतकऱ्याच. बी.ए झालेल्या वडीलाना परीस्थितीने नांगर हातात घ्यायला लावला. पण मला कधी मात्र नागंरायला लावलं नाही. " आम्ही शेती केली तेवढी पुरे, आमच्या मुलांनी सुद्धा शेतीवर अवलंबून राहू नये" अशी त्यांची इच्छा.

सकाळी बैलाना घेऊन बाबा निघायचे. आमचा एक बैल एकदम साधा होता-"बाळ्या". लहान चिमुकल पोरग सुद्धा त्याच्या गळ्यातली दोरी घेऊन त्याला जावू शकत होत. खूप सेवा केली त्याने.



बाबांच्याआणि घरच्यांचा शिस्तीने शिक्षणाचा गोडवा वाढत गेला. शिक्षकांमुळे प्रोत्साहन मिळत गेले.  आणि इथेच ती मैत्रीची लेणी कोरली गेलीत मनात. निस्सीम प्रेम. लहानपणाचे मित्र आणि त्यांची मैत्री. आणि आपले दररोजचे वाडीतले तर असायचेच. काही जण तर मध्ये न सांगता शाळाच सोडून निघूनच गेलेले. काहीच पत्ता नाही. अजूनही! आठवण यायची!
" खय गेले आसतीत ? शाळेत येवचा बंद कित्या केल्यान ? "



चौथीच्या वर्गात शिवराय आणि  त्यांच्या मावळ्याशी ओळख झाली. त्यांच्या कर्तृत्वाने आणि आपलेपणाने देशभक्तीचा धडा गिरविला. आताच्या राजकीय पक्षांनी चालवलेला खेळ मला माझ्या राजांचा अपमान वाटतो.सामाजिक बांधिलकी कुणालाही नको! राजकारण आणी स्मारक पाहिजे!

वरच्या वर्गात माहितीच्या खजिन्यात भर पडत गेली, शिक्षणाची ओढ वाढत गेली आणि माध्यमिक शाळेने खरी आपुलेपणाची जाणीव करून दिली. त्यावर लिहायचा म्हटलं तर एक पूर्ण लेख लिहावा लागेल. नंतर कधीतरी!

हायस्कूलला येताना एका  हातात छत्री आणि दुसरयात सायकलचे Handle. आणि त्यात वारा. शाळेत पोहोचेपर्यंत अर्धे दप्तर भिजून जायचे. हायस्कूलचे मित्र आहेत अजूनही. आता कुठेही पोहोचलो असलो  तरी तो आदर आणि मैत्री आहे. त्यांच्या शिवाय मी पण असा घडलो नसतो.

आयुष्याच्या या वळणावर पोहोचून या सगळ्या बद्दलचा आदर अधिक वाढला आहे. मातीशी संपर्क अजूनही तुटलेला नाही आणि तोडायचा सुद्धा नाही. नाळ आहे ती, जीवनाची उरल्या-सुरल्या.

सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण हा एक लेख पुरेसा नाही ठरणार कदाचित.
" माणूस मोठो झालो, चार पयशे कमयल्यान म्हणजे सगळा झाला नाय,
तेनी खय सुरवात केल्यान आनी ज्यांनी त्येका मदत केली त्या सगळ्यांचो आदर ठेयल्यान म्हणजे कमायल्यान !!"





3 comments:

  1. खुप छान। शहरात राहून भरपुर शिक्षण घेउन घरची जाण व गावाशी असलेले नाते पारसस्पर्श मधे दिसतात.

    ReplyDelete
  2. Khoop chaannnn... John... Amhala ashach nav-navya katha vachayla milu de...
    Awesome writing!!!

    ReplyDelete